चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
सुकी व्हावा जीवन प्रवास.
गुढीपाडवा हा विजय व समृद्धीचे प्रतीक असतो. वाईटापासून दूर राहणे व समृद्धीला आमंत्रण देणारा सण आहे. गुढीला धर्म ध्वज/ब्रह्म ध्वज असे म्हणतात. तेलगू भाषेत गुढीचा अर्थ तोरण असा आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण लवकर उठतात, आंघोळ करतात, गुढी उभारतात व आनंदाने हा सण साजरा करतात. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. नवीन व्यवसाय प्रारंभ करणे व नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे, नवीन संकल्पना, नवे विचार आचरणामध्ये आणले जाऊन नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते.
गुढी उभारणीचे महत्त्व
उभारू गुढी सुख समृद्धीची व यशाची,
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी...
विश्वाची निर्मिती
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली असेही मानले जाते त्यामुळे गुढीला ब्रह्म ध्वज असे म्हणतात.
सम्राट शालिवाहनचा विजय
सम्राट शालीवाहनाने शंकाचा पराभव केल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची आठवण म्हणून सुद्धा गुढी उभी करतात.
प्रभू श्रीराम आयोध्यात परतले
राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून व रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आला. त्यावेळी प्रजेने त्यांचे तोरणे व ध्वज उभारून स्वागत केले. तो दिवस गुढीपाडव्याचा होता. थोडक्यात वाईटाचा शेवट होऊन चांगल्याची सुरुवात होते. तेव्हा गुढी उभारून आनंद साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापकी एक महत्त्वाचा गुढीपाडवा सण
वसंताची पहाट झाली,
पसरला नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला आला चैत्र पाडवा...
1) गुढीपाडवा
2) अक्षय तृतीया
3) दसरा
व दिवाळी मधील दिवाळी पाडवा हे सर्व साडेतीन मुहूर्तापैकीचे शुभ मुहूर्त आहेत. या शुभ मुहूर्तावर नवीन खरेदी, सोने खरेदी, व्यापारी वर्ग नवीन खतावणी सुरू करतात, नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन संकल्पनांची सुरुवात या साडेतीन मुहूर्तावरती करतात.
गुढी कशी उभी करावी?
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याच्या कडा,
साखरेची गाठी व कडू लिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी त्याला भर जरी खण,
आनंदाने साजरा करूयात पाडव्याचा सण.
वेळूवरती साडी, नवीन कापड, कडुनिंबाच्या डहाळी, साखरेच्या गाठी व कलश या सर्वांची मिळून गुढी तयार होते. गुढीचा प्रत्येक घटक हा आपल्याला नवचैतन्य देणारा आहे. तो पुढील प्रमाणे...
कलश- यशश्री
कडुलिंब फाटा- आरोग्य
पुष्पहार- मांगल्या
माधुर्य- साखर गाठी
वैभव- जरी साडी
सामर्थ्य- वेळू काठी
संकल्प- सुपारी
सौभाग्य- हळदीकुंकू
स्थैर्य- पाठ
सिद्धी- श्रीफळ
स्वस्तिकचे महत्व
स्वस्तिक शांती, समृद्धी व मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिकला मंगल चिन्ह असेही म्हणतात. चिरंतन सत्य, शाश्वत शांती, आनंद, ऐश्वर्याची दिव्य सौंदर्याचे निर्देशक आहे. जगातील पहिले साहित्य वेद आहे. या वेदांमध्ये स्वस्तिक चिन्हाचा उल्लेख आहे. हे चिन्ह आर्याचे आदी मांगलिक चिन्ह आहे.
स्वस्तिक या शब्दाचा अर्थ
सु + अस्ती म्हणजे चांगले, कल्याणकारी, मंगल
अस् म्हणजे सत्ता, अस्तित्व.
स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता, मांगले अस्तित्व असा स्वस्तिक या शब्दाचा अर्थ होतो.
कडुलिंब व गुळाचे महत्व
उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते तसेच कडक उन्हामुळे आजारीही पडण्याची शक्यता असते. अशामध्ये कडुलिंब व गूळ हे शरीरास अनेक फायदे मिळवून देतात ते पुढील प्रमाणे...
- कडुलिंब रक्त शुद्धीकरण करते
- कडुलिंबामुळे दाताचा आरोग्य चांगले राहते. तसेच त्याचा ब्रश म्हणूनही दात स्वच्छ करण्यासाठी वापर केला जातो.
- कडुलिंबामुळे त्वचेचे विकार कमी होतात.
- कडुलिंबामुळे रक्ताभिसरण होऊन रक्तप्रवाह चांगला सुधारतो.
- कडुलिंबामुळे शरीर थंड राहते.
- कडुलिंबामुळे पोटाचे विकार कमी होतात.
- कडुलिंबामुळे घशाचे विकार कमी होतात.
- कडुलिंबामुळे केसाचे आरोग्य चांगले राहते.
- कडुलिंबामुळे डासांपासून सुटका मिळण्यास मदत होते.
ब्रह्म ध्वज नमस्तेस्तु सर्वाधिष्ठफलप्रद
प्राप्ते स्मिन वत्सरे नित्य मदृहे मङ्गलं कुरु
अर्थात जो सर्व इच्छित फल प्रदान करतो, अशा ब्रह्म ध्वज म्हणजे गुढीला शतशः नमन.
0 टिप्पण्या